सांगोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रवासी, विचार मंच, सर्व कृती समिती, सामाजिक संघटनेच्यावतीने पहिल्या महाराष्ट्र रेल्वे परिषदेचे आयोजन रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय नायगाव दादर (पूर्व)येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती शहीद अशोक कामटे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलकंठ शिंदे सर यांनी दिली.

प्रामुख्याने अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती यांनी महाराष्ट्र रेल्वे परिषद आयोजित करण्याबाबत संकल्पना मांडली गेली होती याचा हेतू महाराष्ट्रातील बंद केलेल्या अथवा शहरातील मुख्य स्थानकाबाहेर ढकललेल्या रेल्वे गाड्यांबाबत व दीर्घकालीन रखडलेल्या प्रकल्पांबाबत जनजागृती व प्रशासनास इशारा देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रवासी संघटना ,सामाजिक संघटना छत्रछायेखाली असून संवाद साधून पुढील वाटचाल करणे हा आहे.

आज महाराष्ट्राची रेल्वे सेवा एका गंभीर संकटातून जात आहे शून्य आधारित वेळापत्रकाच्या नावाखाली आपल्या हक्कांच्या गाड्या रद्द केल्या. दादर, पुणे, सीएसएमटी यासारख्या मुख्य केंद्रावरून आपल्या हक्काच्या गाड्या कमी करून परराज्यातील गाड्यांना पायघड्या घातल्या जात आहेत हा केवळ कॅपॅसिटीचा प्रश्न नसून महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि गरजेवर केलेला अन्याय आहे.
आपले राज्य रेल्वे प्रकल्पांसाठी 50% ते 70 टक्के आर्थिक भार उचलते. जमीन मोफत देते तरीही पायाभूत प्रकल्प धूळखात पडून आहेत. पश्चिम महाराष्ट्र असो वा कोकण रेल्वे प्रत्येक ठिकाणी केवळ आश्वासनांची बोळवण होत आहे. आपल्या हक्काच्या गाड्यांसाठी आपल्याला कायम विनवण्या कराव्या लागत आहेत ही परिस्थिती आता सहन करण्या पलीकडे गेली आहे.

कोरोनापूर्वी महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या हुबळी– मिरज– पंढरपूर लिंक एक्सप्रेस, कोल्हापूर –सोलापूर –कोल्हापूर एक्सप्रेस, कोल्हापूर– पूर्णा, कोल्हापूर– हैदराबाद, साईनगर शिर्डी– पंढरपूर एक्सप्रेस यासह महाराष्ट्रातील अनेक रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाने कोणतीही कारण न देता थेटपणे बंद केलेल्या आहे. या प्रश्नावर देखील मोठे जन आंदोलन या परिषदेच्या माध्यमातून उभारले जाणार आहे .
अखंड कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी, कोकण विकास समिती, कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सामाजिक प्रवासी संघ, मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघ, मराठा ऑर्गनायझेशन, कोकण कृती संघ, गणेश भक्त कोकणवासी प्रवासी संघ मुंबई, जल फाउंडेशन, मुंबई –गोवा महामार्ग जनआक्रोश समिती, रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण, सावंतवाडी, वैभववाडी तालुका विकास मंच, दोडामार्ग तालुका विकास मंडळ, कसाल रेल्वे स्थानक संघर्ष समिती, खोकला ग्रामविकास मंडळ जनजागृती सेवा संस्था, शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना सांगोला यासह महाराष्ट्रातील अनेक स्वयंसेवी संस्था आपला सहभाग परिषदेत नोंदवून परिषदेमार्फत मागण्या करणार आहेत. एकत्र येऊया आणि रेल्वे बोर्डाला ठणकावून सांगूया भारतीय रेल्वेवर आमचाही अधिकार आहे,आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या हक्काच्या प्रवासासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांच्या सोयीसाठी या परिषदेला महाराष्ट्रातील नागरिकांनी उपस्थित रहावे. परिषदेस सहभागी होण्याकरता भ्रमणध्वनी क्रमांक 8983541515 या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावीअसे आव्हान अशोक कामटे संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

पंढरपूर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असल्याने संपूर्ण देशभरातून भाविक–भक्त या ठिकाणी येत असतात त्यांना मुंबईतून दररोज रेल्वे सेवा सुरू व्हावी तसेच दिल्ली, वाराणसी,चंदिगड, चेन्नई, कोलकत्ता, विशाखापट्टणम या रेल्वे सेवा सुरू होणे आवश्यक आहे . मिरज –कुर्डूवाडी लोहमार्गाचे दुहेरीकरणही तितकेच तात्काळ होणे गरजेचे आहे याकरता अशोक कामटे संघटनेचा पाठपुरावा सुरू आहे. वरील मागण्याकरण्याकरता परिषदेच्या माध्यमातून जनजागृती करून आवाज उठविणार आहे. रेल्वे परिषदेत रेल्वे समस्यांचे सादरीकरण, प्रवासी संघटनांची मते सूचना, तज्ञांचे मार्गदर्शन, मागण्यांबाबत चर्चा, पुढील आंदोलनाची दिशा यावर चर्चासत्र होणार आहे इच्छुकानी सहभाग नोंदवावा.
निलकंठ शिंदे सर, अध्यक्ष अशोक कामटे संघटना,सांगोला
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



