सांगोला (प्रतिनिधी): काल सांगोला तालुक्यातील राजुरी, अनकढाळ, पाचेगाव, जुनोनी आणि कोळा परिसरात काल संध्याकाळी झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह भीषण गारपिटीमुळे शेतीचे व प्रामुख्याने फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीची गांभीर्याने दखल घेत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आज कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांच्यासह राजुरी परिसरातील द्राक्ष व डाळिंब बागांची प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणी दरम्यान आमदार देशमुख यांनी सांगितले की, “पडलेल्या गारांचा आकार मोठा असल्याने द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या आहेत. या भागात डाळिंब आणि द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणात आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून डाळिंबासोबतच मका पिकालाही मोठा फटका बसला आहे.”

आमदार देशमुख यांनी घटनास्थळावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय (मामा) भरणे आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. नुकसानीची भीषणता सांगून त्यांनी तात्काळ मदतीची मागणी केली. शासनाकडून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून,

आगामी विधानसभेच्या अधिवेशनात या प्रश्नावर आवाज उठवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले. याप्रसंगी तहसीलदार, कृषी अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आणि बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



