महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे, पावसामुळे राज्यात प्रचंड नुकसान झालं आहे. याचा मोठा फटका हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बसला आहे. विदर्भातही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचं संकट निर्माण झालं आहे, अनेक गावांना पुराचा वेढा पडल्यानं संपर्क तुटला आहे, काही ठिकाणी पुराच्या पाण्यात लोक अडकल्याचं पहायला देखील मिळत आहे. तर काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक देखील ठप्प झाली आहे. यातच आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पुढील काही दिवस तरी राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे,आयएमडीनं वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्या मराठवाड्यात नांदेड वगळता सर्व सातही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भात देखील उद्या पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भाला देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील गडचिरोली, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, बुलढाणा आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये मंगळवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रासाठी देखील पुढचे 24 तास महत्त्वाचे असणार आहेत. सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


