सांगोला (प्रतिनिधी): सांगोला विधानसभा मतदारसंघात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडले असताना, सांगोला मतदारसंघातील आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

तसेच महिम, आलेगाव, जवळा आणि आगलावे वाडी या गावांतील मृतांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर १ लाख रुपयांची तात्काळ मदत देण्याची आग्रही मागणी केली. या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवत लवकरात लवकर मदत जाहीर करण्याचे आश्वासन दिले. ऑगस्ट महिन्यापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतजमिनींमध्ये पाणी साचले असून, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः महिम, आलेगाव, कडलास, महूद, सोनंद, वाटंबरे, अकोला, जवळा आणि आगलावे वाडी या गावांमध्ये पावसाच्या तीव्रतेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांना आणि शेतांना धक्का बसला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील परिस्थिती सांगताना, “ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा शेतकरी आणखी संकटात सापडतील.” त्याचबरोबर, मृतांना १० लाख रुपयांची मदत आणि प्रति एकर १ लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी त्यांनी पुन्हा पुन्हा अधोरेखित केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना म्हटले की, “सांगोला मतदारसंघातील सद्यपरिस्थितीची तात्काळ चौकशी करून मदत केली जाईल असे सांगितले. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून मदतीची मागणी केल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



