सांगोला (प्रतिनिधी) – छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील विविध प्रकारची विषमता नष्ट करण्यासाठी आणि वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी संविधान संवादक व अन्य परिवर्तनवादी विचारांच्या संस्था संघटनांनी आयोजित केलेल्या मानवी साखळीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे यांनी केले आहे.
आपल्या देशाच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सांगोल्यात अभिमानाने आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देत साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने २६ जून रोजी महात्मा फुले चौक, सांगोला येथून मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे.समाजातील प्रत्येक घटकाला समता, सामाजिक सलोखा आणि न्यायाची मूल्ये समजावीत व ती प्रत्यक्षात समाजात रूजावीत, यासाठी शाहू महाराज यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आणि त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा जागर करण्याच्या हेतूने ही मानवी साखळी आयोजीत केली जात आहे.
शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली करून समतेचा दीप प्रज्वलित केला. त्यांनी सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. आजही त्यांच्या विचारांची समाजाला गरज आहे. विषमता दूर करून समाजात ऐक्य, बंधुता व मानवतेचे वातावरण निर्माण करणे, ही काळाची गरज आहे. संविधानिक मूल्यांचा प्रसार आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ करण्यासाठी ही साखळी महत्वपूर्ण ठरणार आहे. सर्व जाती-धर्म, लिंग, वर्ग या भेदांपलीकडे जाऊन समतेचा आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या मानवी साखळीत सांगोला व परिसरातील शाळा, महाविद्यालये, संस्था, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बापूसाहेब ठोकळे यांनी केले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक