सांगोला (प्रतिनिधी): विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील सिंगल फेज लोडशेडिंग तात्काळ बंद करण्याबाबत आज मुंबई येथे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांची आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भेट घेत सिंगल फेज लोडशेडिंग तात्काळ बंद करण्यात यावे अशी निवेदनाद्वारे मागणी केली.

सांगोला विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये मागील काही महिन्यांपासून सिंगल फेज लोडशेडिंग हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, लघुउद्योग यांना या लोडशेडिंग धोरणामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सिंचनासाठी पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नुकसान होत असून, लघुउद्योग आणि व्यवसाय ठप्प होत आहेत.

सर्वसामान्य कुटुंबांच्या दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. राज्य शासन ‘स्मार्ट महाराष्ट्र’ आणि ‘शेतकरी सशक्तीकरणा’चे उद्दिष्ट ठेवून कार्यरत आहे, परंतु प्रत्यक्षात ग्रामीण भागात वीजपुरवठ्याच्या अन्यायकारक लोडशेडिंगमुळे नाराजी आणि असंतोष प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचे मुख्यमंत्री महोदयांना सांगितले. याबाबत आपण तातडीने हस्तक्षेप करून ग्रामीण भागातील सिंगल फेज लोडशेडिंग बंद करण्याचे आदेश द्यावेत आणि अखंडित वीजपुरवठा सुरु करावा अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे केली. यावेळी मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य केले. याबद्दल आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


