3 मे नंतर तीव्र आंदोलनाचा इशारा, राज्यातील संघटनांचे मंथन
सांगोला (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या समस्या, रखडलेले रेल्वे प्रकल्प, बंद गाड्या आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर राज्यस्तरीय आवाज बुलंद करण्यासाठी दादर येथे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र रेल्वे परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली. गतिमान अखंड महाराष्ट्र हे ब्रीद वाक्य घेऊन पार पडलेल्या रेल्वे परिषदेत राज्यातील रेल्वे अभ्यासक, विविध प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

परिषदेत संपर्क, सुसंवाद, सतर्कता आणि समस्या निवारण या चतू सूत्रीवर आधारित थेट संवाद साधण्यात आला. मुंबई ,कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच राज्यातील इतर भागातील रेल्वे प्रवासातील अडचणी, गाड्यांची कमतरता, तांत्रिक अडथळे, रखडलेले प्रकल्प, आणि प्रवासी सुविधांचा अभाव या मुद्द्यांवर सखोल मंथन करण्यात आले.

बंद गाड्या तातडीने सुरु करण्याची मागणी कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या सोलापूर– कोल्हापूर एक्सप्रेस, रत्नागिरी– दादर पॅसेंजर, मिरज ,–पंढरपूर सुपरफास्ट एक्सप्रेस, कोल्हापूर –बिदर एक्सप्रेस, कोल्हापूर– पंढरपूर– हैदराबाद एक्सप्रेस, साईनगर शिर्डी– पंढरपूर एक्सप्रेस, कोल्हापूर –मुंबई सह्याद्री एक्सप्रेस, मुंबई– विजापूर फास्ट पॅसेंजर यास तब्बल 30 गाड्या तातडीने पूर्ववत कराव्यात , कुर्डूवाडी दुपारी 2 नंतर कोल्हापूरकडे 20 तास रेल्वे सेवा नाही ती सुरू करावीअशी जोरदार मागणी परिषदेतून करण्यात आली.

कोकण रेल्वेचे रखडलेले प्रकल्प,लातूर –कुर्डूवाडी– मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासह रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा आग्रह व ती तातडीने पूर्ण करण्यात यावी अशी भूमिका या परिषदेत मांडण्यात आली.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी अधिक दक्षता, स्वच्छता, स्थानकांवरील सुविधा, तांत्रिक अडचणीचे निराकरण, आणि प्रशासनाशी त्वरित संवाद यावरही भर देण्यात आला. प्रलंबित तांत्रिक मागण्यांचा तातडीने पाठपुरावा करून त्या मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या परिषदेला खासदार अरविंद सावंत, माजी खासदार विनायक राऊत यांची विशेष उपस्थिती लाभली. दोन्ही नेत्यांनी रेल्वे प्रवाशांच्या रास्त मागण्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रभावी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या परिषदेमुळे रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांना आता एक व्यापक व प्रभावी व्यासपीठ मिळाल्याची भावना व्यक्त होत असून आगामी काळात रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारले जाण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. या परिषदेसाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात संघटनांचे प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त करून समस्या मांडल्या.

रेल्वे परिषदेत राज्यातील 30हून अधिक संघटनांचा सहभाग, या परिषदेला कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई महानगर परिसरातील रेल्वे व प्रवासी हक्कांसाठी कार्यरत असलेल्या 30 हून अधिक संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील सर्व संघटनांनी एकत्रित येत रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांसाठी संयुक्तीत लढा उभारण्याचा निर्धार केला. तसेच सांगोला स्टेशनवरून बंद करण्यात आलेली किसान रेल्वे पूर्ववत करावी , दादर –सातारा एक्सप्रेस दररोज सुरू करावी, सांगोला पंढरपूर शेगाव रेल्वेचाही प्रस्ताव परिषदेस दिला आहे.
निलकंठ शिंदे सर ,अध्यक्ष:–शहीद अशोक कामटे सामाजिक संघटना, सांगोला

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



